आता नको, मग नको
आर्थिक नियोजन आणि चालढकल – कल करे सो आज कर!
गेल्याच आठवड्यात एकीचा फोन आला. आर्थिक नियोजनाबद्दल बोलायचंय म्हणाली. आमच्या एका मित्राच्या ऑफिसमधे काम करते आणि त्यानेच माझा फोन नंबर दिल्याचं सांगितलं. गप्पा झाल्या, भेटायचं कधी ते ठरलं, पण त्यापुढे तिने जे सांगितलं ते ऐकून मी विचारात पडले. ती म्हणाली गेलं सुमारे दीड वर्ष ती आता फोन करू, मग फोन करू ठरवत होती आणि काहीनाकाही कारणाने तो राहून जात होता. दुसरी एक मैत्रीण महिन्याआड स्वतः फोन करून ‘हे सगळं फार महत्त्वाचं आहे गं. मी तुला पुढल्या आठवड्यात नक्की भेटायला येईन’ असं आश्वासन गेलं वर्षभर देतेय. गेली ६-७ वर्षे ह्या क्षेत्रात काम करून एक गोष्ट जी मला प्रकर्षाने जाणवली आहे ती म्हणजे बहुतेक सर्वच लोक ‘आर्थिक नियोजन’ हा विषय आला की चालढकल करतात. त्यासाठी कारणे अनेक आहेत.
चालढकल करणे (procrastination) ही एक सवय आहे. आपण आयुष्यात अनेक गोष्टींची चालढकल करत असतो. परीक्षेचा अभ्यास आदल्या रात्री जागून करणं, इन्शुरन्स पॉलीसीच्या शेवटच्या दिवशी नूतनीकरणासाठी पळापळ करणं, ३१ जुलैला टॅक्स रिटर्न भरायला बसणं किंवा दरवर्षी २०-२२ मार्चनंतर करबचतीच्या गुंतवणुकीचे पर्याय शोधायला सुरुवात करणं ही सगळी त्याचीच उदाहरणे.
कुठलीही गुंतवणूक किंवा आर्थिक नियोजन करताना वेळ हा घटक फार महत्त्वाचा असतो. आपण गुंतवणुकीला वाढण्यासाठी जेवढा जास्त वेळ देऊ शकतो तेवढा जास्त परतावा त्यातून मिळू शकतो. म्हणजेच लवकरात लवकर गुंतवणुकीला सुरुवात केल्यास उद्दिष्टपूर्ती सहजसाध्य होते.
आर्थिक नियोजनाची चालढकल आपल्या कुटुंबासाठी फार खर्चिक ठरू शकते. एका सोप्या उदाहरणातून हे स्पष्ट होईल. समजा गार्गी आणि मैत्रेयी नावाच्या दोन समवयस्क मैत्रिणी वयाच्या २५व्या वर्षी एकाच दिवशी नोकरीला लागल्या. गार्गीने पहिल्या पगारापासून दरमहा रू ५०००/- बचत करायला सुरुवात केली आणि दरवर्षी ६०,००० प्रमाणे पुढील १० वर्षात रू ६ लाख गुंतवले. त्यापुढे तिने नवीन गुंतवणूक करणं थांबवलं. ह्या उलट मैत्रेयीने पहिली १० वर्षं चालढकल केली, आणि वयाच्या ३५व्या वर्षापासून दरमहा रू ५०००/- गुंतवायला सुरुवात केली. गार्गीप्रमाणेच तिनेदेखील पुढील १० वर्षात रू ६ लाख गुंतवले आणि पुढची गुंतवणूक थांबवली. वयाच्या साठीला सेवानिवृत्तीच्या वेळी त्या दोघींच्या गुंतवणूक परताव्यात किती फरक पडला असेल? दोघींनाही गुंतवणुकीवर वार्षिक ८%ने परतावा मिळत गेला असे धरल्यास गार्गीच्या खात्यात रू ६३ लाख जमा झाले असतील तर, मैत्रेयीच्या खात्यात फक्त रू २९ लाख! म्हणजेच बाकीचे घटक कायम ठेवता, १० वर्षांच्या चालढकलीमुळे मैत्रेयीचं ५०%हून जास्त नुकसान होईल.
मात्र आपले मोठे नुकसान होऊ शकते हे कळून सुद्धा चालढकल आपल्या हातून घडत असते. कळतंय पण वळत नाही म्हणतात ना तेच हे! गंमत म्हणजे ह्याचं मानसशास्त्रीय कारण काय या विषयावर अनेक तज्ज्ञांनी संशोधन केले आहे. त्यातून असं लक्षात आलं की आपला मेंदू करायच्या सर्व कामांची वेळेनुसार दोनच कप्प्यात वर्गवारी करत असतो – ‘आत्ता’ आणि ‘नंतर’. म्हणजे सोमवारी, पुढल्या आठवड्यात, पुढल्या महिन्यात वगैरे करायची सगळीच कामं ‘नंतर’ कप्प्यात जातात. ‘आत्ता’ करायच्या कामांच्या तुलनेत ‘नंतर’ म्हणजेच भविष्यात कधीतरी करायच्या कामांचं फारसं दडपण आपला मेंदू घेत नाही. त्यामुळे जी गोष्ट आपल्याला जराशीदेखील कठीण, कष्टप्रद, गुंतागुंतीची वाटते तिला आपला मेंदू ‘नंतर’ कप्प्यात टाकून देतो. त्यामुळेच आपलं ‘जिमला जायचेय? १ तारखेपासून नक्की, ‘डाएटिंग सुरु करायचंय? पुढल्या आठवड्यापासून करू’, ‘वार्षिक चेकअपसाठी डेन्टिस्टकडे जायचा दिवस आला? जाऊ पुढच्या शनिवारी’ असं सारखं होत असतं.
या ‘नंतर’ कप्प्यातली कामं महत्त्वाची आहेत, आणि आपण ती करायची आहेत असं आपण स्वतःला बजावत राहतो, पण त्यातली बहुतांशी कामं अनिवार्य होईपर्यंत त्याच कप्प्यात पडून राहतात. आर्थिक नियोजन, गुंतवणूक, जमाखर्च आणि त्यासाठीची आकडेमोड ह्या गोष्टी बऱ्याच लोकांनी कुठेतरी मनात कठीण, क्लिष्ट, अवघड आहेत असं ठरवून टाकलेल्या असतात. त्यामुळे त्या ‘नंतर’ कप्प्यातून ‘आत्ता’ कप्प्यात कधीच येत नाहीत. दुसऱ्या असंख्य सोप्या, सवयीच्या, आरामाच्या, आवडीच्या गोष्टी आपण करत राहतो, आणि ‘आर्थिक नियोजन ना? नक्की बघू पुढच्या महिन्यात’ असं स्वतःलाच बजावत राहतो.
ह्या चालढकलीच्या समस्येतून बाहेर पडायचं तर आपल्या मनाला थोडसं फसवायची गरज आहे. ‘३ इडियट्स’ मधला आमीर खान उर्फ रॅन्चो नाही का सांगायचा ‘आपलं मन घाबरट असतं. त्याला शांत ठेवण्यासाठी फसवावं लागतं. कितीही कठीण प्रसंग आला तरी तुमच्या मनाला बजावत राहा All is well!’ तसंच काहीसं 😊
तुम्ही तुमच्या मनाला सांगा ‘आज फक्त दहा मिनिटं – फक्त दहाच मिनिटं – आर्थिक नियोजनासाठी घालवू’. तुम्ही ‘फक्त १० मिनिटं’ म्हटलंत की तुमचा मेंदू हे क्लिष्ट, कठीण वाटणारं काम ‘नंतर’ कप्प्यातून ‘आत्ता’ कप्प्यात आणायला तयार होईल. हे तुम्ही साधलत तर निम्मी फत्ते झालीच म्हणून समजा. ताबडतोब कागद-पेन घ्या किंवा कॉम्प्यूटर चालु करा आणि आपल्या आर्थिक नियोजनाबद्दल मनात येणारे विचार, प्रश्न, शंका, अपेक्षा, कल्पना हे नुसतं लिहून काढायला सुरुवात करा. एकदा सुरु केलेत म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की आधी वाटले होते तेवढ्या काही ह्या गोष्टी क्लिष्ट वा अवघड नाहीत. ह्या लेखमालेत डिसेंबरमधील काही लेखात आर्थिक उद्दिष्टे कशी निश्चित करावीत, त्यासाठी गुंतवणूक किती करावी ह्यासाठीची सुलभ अंदाज कोष्टके दिली होती. आकडेमोडीशिवाय उत्तरं शोधण्यासाठी त्यांचा उपयोग करा. तुमच्या अनेक प्रश्नांना इंटरनेटवर उत्तरं सापडू शकतात ती बघा. आणि तरीही ज्या शंका असतील त्यांचं निरसन अनुभवी व्यक्तींकडून करून घेता येईल. एक अगडबंब वाटणारी गोष्ट कृतीशील छोट्या छोट्या भागात विभागली जाताच सहजसाध्य वाटू लागेल.
आर्थिक नियोजनाबाबत सततची चालढकल हे मानसिक अस्वस्थतेचं कारण ठरू शकते. आपण कमावतो आहोत ते पुरेसं आहे का, पुरेशी बचत करत आहोत का, खर्च कमी करायची गरज आहे का, योग्य गुंतवणूक करतो आहोत की नाही अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला नियोजनामुळे मिळू शकतात. आणि भविष्यातील महत्त्वाच्या प्रसंगी योग्य वेळी पुरेसा निधी उपलब्ध होणार आहे ह्याची खात्री आपल्याला मनःशांती मिळवून देते.
पैसा हे एक साधन आहे. त्याच्या सुयोग्य नियोजनाने आपण आपल्या गरजा आणि इच्छा पूर्ण करून आपले आयुष्य समृद्ध करू शकतो. फक्त त्यासाठी थोडी मानसिक शिस्त गरजेची आहे.
चला तर मग! संत कबीरांचा उपदेश “कल करे सो आज कर, आज करे सो अब” आर्थिक नियोजनाला देखील लागू करूयात आणि मनाच्या ‘नंतर’ कप्प्यात राहून गेलेला हा विषय ‘आत्ता’ कप्प्यात आणूयात.
--- प्राजक्ता कशेळकर